राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थतीशी दोन हात करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा मैदानात उतरले आहे. आज जागोजागी चारछावणी, पाण्याचे टँकर या द्वारे दुष्काळ भागात मदत करण्याचे काम शिवसेना करताना दिसत आहे. त्यातंच आता आदित्य ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकरी नामदेव पतंगे यांच्या कर्जाची जबाबदारी उचलली आहे. कर्जबाजारी शेतकरी नामदेव पतंगे शिवसेना भवनात आले होते. त्यांची हलाखीची परिस्थिती ऐकल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या कर्जाची जबाबदारी उचलली आहे. सोमवारी सकाळी आरटीजीएसच्या माध्यमातून कर्जाच्या रकमेची परतफेड होणार आहे.
एकीकडे पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात दुष्काळाचा वणवा भडकला आहे. निसर्गाचा असा मार खाल्लेला बळीराजा कर्जाच्या गर्तेत अधिकच ढकलला जात आहे. अशाच एका कर्जबाजारी शेतकर्याने आज मदतीची आर्त विनवणी करीत थेट शिवसेना भवन गाठले. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या शेतकर्याची कहाणी ऐकली आणि त्याच्या कर्जाची जबाबदारी उचलत असल्याचे जाहीर केले.