भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं आहे. सुषमा स्वराज यांना रात्री ९ च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपाच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. सुषमा स्वराज नावाच्या तेजस्वी युगाचा अंत झाला आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे केवळ देश आणि भाजपाचीच नव्हे तर ठाकरे कुटुंबाचीही हानी झाली आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यातला दुवा म्हणून सुषमा स्वराज यांनी अनेकदा काम केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सुषमा स्वराज यांच्या नात्यात एक आत्मीयता होती. बाळासाहेबांच्या जाण्यानंतरही हे नातं कायम राहिलं. त्यांच्या वागण्या-बोलण्यात आणि नेतृत्वात तेज आणि मांगल्य होते. त्यांच्या जाण्याने एका तेजस्वी युगाचा अंत झाला आहे’ अस उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.