राज्यात वंचित बहुजन आघाडी-एमआयएम युतीला तोड नाही. तरीही एमआयएमला आठ जागा देऊ असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आम्हाला का झुलवत ठेवत आहेत? हे कळायला मार्ग नाही. बहुदा एमआयएमला सोबत घेऊ नका अशी आरएसएसची फुस असावी अशी शंका खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. एमआयएम सोबतच्या आघाडीची बोलणी आम्ही पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांच्याशीच करू, इम्तियाज जलील यांना ते अधिकार नाहीत असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी अजूनही आमची युती कायम असल्याचे स्पष्ट केले होते.
इम्तियाज जलील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत एमआयमने आपल्या जागांची यादी द्यावी हे जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी सांगितले तेव्हा आम्ही त्यांना 98 जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यांनी तो कमी करून पाठवण्यास सांगितले तेव्हा, तो 74 जागांवर आणला. पंरतु त्यानंतर त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. ओवेसी आंबेडकरांच्या बैठकीत देखील त्यात तोडगा निघाला नाही.