विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादी आणि भाजपा नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वतः मैदानात उतरून पक्षाला उभारी देण्याचे काम करत आहे. या प्रचारात सर्वच नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालापूर्वीच पवार आणि फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसून येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर भाष्य करताना काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर नेते भाजपामध्ये आले आहेत. ज्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली तेच राजकारण त्यांच्या अंगलट आले आहे. शरद पवारांचे राजकारण आता संपुष्टात आले आहे असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाला राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर येण्याची शक्यता आहे.
तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी तोडण्या-फोडण्याचे राजकारण केले त्यामुळे आता त्यांना हे भोगावे लागत आहे.
नवीन पिढीचं राजकारण वेगळं आहे. मी शरद पवार नाही, मी देवेंद्र फडणवीस आहे आता आमचं राजकारण सुरु झालंय अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. ते एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलत होते. त्यामुळे येणाऱ्या दिवसात या दोन्ही पक्षाच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या वाढताना दिसून येणार आहे.