बीडमध्ये शरद पवारांनी जयदत्त क्षिरसागर यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर आज जयदत्त क्षिरसागर यांनी पवारांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. पवारांनी दुसऱ्यांच्या घरात वितुष्ट आणून घरं फोडली. यात गोपीनाथ मुंडेंचं घर फोडून पुतण्याला बक्षीस दिले. असे राज्यात अनेकांच्या बाबतीत घडलं आहे. पवारांनी दुसऱ्याला आदेश देण्यापेक्षा स्वत: आत्मपरीक्षण करावे असा सल्ला मंत्री जयदत्त क्षिरसागर यांनी पवारांना दिला आहे. ते बीडमधील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, पक्षात असतानाच पवारांना विचारायचे होते की १५ वर्षांत त्यांनी काय केले. राष्ट्रवादीत माझी कोंडी केली होती. ते फोडण्याकरता मी सेनेत गेलो आहे. मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी जे काम या युती सरकारने केले ते काम आघाडी सरकारने कधीच केले नाही. अशी टीकाही त्यांनी पवारांवर केली. दुर्दैवाने राष्ट्रवादीत मतभेद असायला पाहिजे होते मनभेद नाही. याकरणामुळे मोठ्या प्रमाणत लोक पक्ष सोडून चालले आहेत. याचे आत्मचिंतन पवारांनी करावं.’अशा शब्दात क्षिरसागर यांनी पवारांवर टीका केली आहे.