राज्यात महायुतीचे सरकार बहुमतात येऊन सुद्धा भाजपाच्या आडकाठीमुळे महराष्ट्रात युतीचे सरकार येऊ शकले नाही. त्यातच भाजपाने लोकसभा निवडणुकीला शिवसेना पक्षाला दिलेले वचन न पाळता मुख्यमंत्री पदावरून आपलेच शब्द फिरविले. त्यामुळे भाजपाला दिलेल्या वचनाची आठवण करून देण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक खासदार संजय राऊत स्वतः मैदानात उतरले होते. भाजपाला दिलेल्या वचनाची आठवण करून देताना अक्षरशः भाजपा नेत्यांना राऊतांनी घाम फोडला होता. आज त्याच वाघाचा वाढदिवस असल्यामुळे संजय राऊत यांच्या बद्दल जाणून घेऊया…
शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे प्रवक्ते, शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक अशा अनेक भूमिका निभावणारे संजय राऊत नेहमीच भाजपाला अंगावर घेत आले आहेत. तसेच पक्षाच्या प्रत्येक भूमिकांसाठी ते ठाम राहिले आहेत. संजय राऊत हे आळीपाळीने विद्धान आणि पहेलवान या दोन्ही भूमिका नेटकेपणाने बजावतात. म्हणूनच मास बेस नसला, तरी राजकारणात राऊतांच्या प्रत्येक शब्दाला आज वजन आहे. दिल्लीत भाजपविरोधात मोर्चेबांधणीसाठी चंद्राबाबू नायडूंपासून ममता बॅनर्जींपर्यंतच्या भेटीगाठी असो, संजय राऊत प्रत्येक आघाडीवर पुढे राहिले आहेत.
संजय राऊत हे महाराष्ट्रात शिवसेनेचे आणि दिल्लीत पवारांचे स्नेही असतात, अश्या चर्चाही होतात. मात्र राऊतांच्या याच स्नेहामुळे भाजपाच्या सत्तेची चव अनेकदा तीखट केली आहे. म्हणूनच हिंदुत्वाआडून ठसठसीत पुढे येणारी ”मराठी अस्मिता” राऊतांच्या बोलण्यातून वारंवार जाणवते. कधी-काळी राऊत हे राज ठाकरेंच्याही जवळचे होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या मनधरणीसाठी राऊत आणि मनोहर जोशी राज ठाकरेंच्या घरी पोहचले. मनसेच्या स्थापनेनंतर मात्र राऊतांनी सामनातून शिवसेनेच्या भूमिकेला अजून धारदार केली आणि हळूहळू ते पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या विश्वासातले नेते बनले.