महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेसाठी महाशिवआघाडीच्या बैठकांवर सुरु आहेत. किमान एकसुत्री कार्यक्रमावर तीनही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बदलत्या विधानामुळे आता शिवसेनाही फुंकून पाऊल टाकत आहे. सत्तास्थापने संदर्भात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अल्टीमेटम दिल्याची माहिती ‘झी न्यूज’ला सुत्रांनी दिली आहे. या पार्श्वभुमीवर छोट्या सहयोगी पक्षांशी चर्चा करुन शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत समाजवादी पार्टीने हिरवा कंदील दाखवला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन आमदार असलेल्या समाजवादी पार्टीच्या अबू आझमी शिवसेनेसोबत जाण्यास सकारात्मकता दर्शवली आहे. पण यासाठी काही अटी असतील असेही ते म्हणत आहेत.शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा दूर ठेवून किमान एकसूत्री कार्यक्रमावर बोलण्यास तयार असेल तर आम्हाला राज्यात शिवसेनेसोबत एनसीपी आणि काँग्रेस सरकारमध्ये जाण्यास हरकत नसेल असे अबू आझमी म्हणाले. पण यासंदर्भातील शेवटचा निर्णय हा अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केल्यानंतरच होईल असेही ते म्हणाले.