दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती गठीत करावी दिल्लीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या समितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी विशेष समिती स्थापन करून समग्र योजना तयार करावी” अशा शब्दांत खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईच्या वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येला लोकसभेत वाचा फोडली. नियम 193 अन्वये सुरू असलेल्या चर्चेत, मुंबईतील वायू प्रदूषणाची भीषणता दर्शवणारी माहिती खासदार शेवाळे यांनी सभागृहासमोर मांडली.
खासदर शेवाळे म्हणाले की, नोव्हेंबर २०१७ मध्ये दिल्लीतील वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी माननीय पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली ‘हाय लेव्हल टास्क फोर्स‘ ची स्थापना करण्यात आली. तसेच पर्यावरण विभागामार्फत ‘नॅशनल क्लीअर एअर प्रोग्रॅम’ ची सुरुवात करण्यात आली आहे. याच धर्तीवर मुंबईतील आणि विशेष करून दक्षिण-मध्य मुंबईतील वायू प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने विशेष योजना तयार करावी. वायू प्रदूषण रोखण्यासाठी, राज्य सरकारला केंद्र सरकारने उचित सहकार्य आणि मार्गदर्शन करावे.
मुंबईतील वायू प्रदूषणाची भीषणता अधोरेखित करताना खासदार शेवाळे म्हणाले,कारखाने, वाहने यातून बाहेर पडणारे विषारी वायू, रस्ते, इमारतींचे बांधकाम- निष्कासन यांतून उडणारी धूळ, कचऱ्याच्या ज्वलनामुळे होणारा धूर ही मुंबईतील वायू प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. वाहनांची वाढती संख्या, नियोजनाविना केला जाणारा विकास यांमुळे मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वांत जास्त प्रदूषित शहर झाले आहे.
हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या राज्यातील ७२ ठिकाणांपैकी केवळ ४ ठिकाणी प्रदूषणाची मात्रा ही नियंत्रणात आहे. ‘केंद्रीय वायू प्रदूषण नियंत्रण समिती’ वायूच्या गुणवत्तेसाठी ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा जास्त प्रदूषण, दक्षिण- मध्य मुंबईतील सायन परिसरात आहे. मुंबईच्या हवेतील आर एम पी एम म्हणजेच धुळीचे प्रमाण १४७ आहे. वास्तविक हे प्रमाण ६० असायला हवे. तसेच वायू प्रदूषण रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सूचित केले.