समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे | Let's make Maharashtra a social reformer

मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पहिल्यांदा या सभागृहात आलो असून महाराष्ट्रातील साधु-संत आणि समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केले. मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव १६९ मतांनी संमत झाल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज कामकाज झाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, मंत्रिमंडळावर सदस्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे त्याबद्दल मी आभार मानतो. तमाम जनतेचे आभार मानून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले या समाजसुधारकांना आणि आई-वडीलांना स्मरण करीत महाराष्ट्र घडविण्यचे शपथ घेतली आहे. त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

देशात अनेक राज्ये आहेत त्यात महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा असून हे दैवत या मातीत जन्माला आले आहे. हे राज्य साधु-संताचे, वीरांचे आणि समाजसुधारकांचे आहे. मी मैदानातला माणूस असून वैधानिक वातावरणात आलो आहे ते महाराष्ट्र घडविण्यासाठी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, सभागृहात झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजुने १६९ सदस्यांनी अनुकूल मत दिले. तर ४ सदस्य तटस्थ राहिले. ठरावाच्या विरोधात मतदानासाठी सभागृहात एकही सदस्य उपस्थित नव्हते. सदस्य श्री.अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला सदस्य सर्वश्री. जयंत पाटील, नवाब मलिक, सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, अबू आझमी, हितेंद्र ठाकूर, बच्चू कडू यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, डॉ.नितीन राऊत या सदस्यांना परिचय करून दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here