राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी असली तरी याचा अर्थ आम्ही भाजपासोबत कधीच जाणार नाही असा होत नाही, असे विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी नुकतेच केले होते. मात्र, त्यांचे हे विधान वैयक्तिक असल्याचे सांगत ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं आहे. गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याबाबत मनोहर जोशींनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक विधान असून शिवसेनेची ती अधिकृत भुमिका नाही. त्यांच्या पिढीच्या नेत्यांमध्ये अशा प्रकारच्या भावना असणं हे स्वाभाविक आहे.”
शिवसेना आणि भाजपामध्ये निर्माण झालेला दुरावा आणि संभाव्य शक्यतांवरही जोशी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही. त्यावेळी मतं गोळा करण्याच्या निमित्तानं किंवा आपला पक्ष पसरवण्याच्या निमित्ताने अशा गोष्टी घडत असतात. तसे सध्या शिवसेना आणि भाजपा यांच्याबाबतीत झाले आहे.