समृद्धी नव्हे आता “हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग”
नागपूर, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱ्या नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचे हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयाबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढून निर्णय घेतला आहे. मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्गाला हिंदूह्दय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्री मंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. यावर आज अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे.
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्याचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. असे मत मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. या प्रकल्पासाठी सुमारे ५६ हजार कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार आहे. मुंबई -नागपूर या शहरातील ७१० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ६ तासात होणार आहे. तब्बल १२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागातील ठाणे , नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्यातील २७ तालुक्याच्या ३५० गावांमधून जाणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपदांचे काम पूर्ण झाले असून लवकरच प्रकल्पाला सुरवात होणार आहे.