सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादांची बुद्धी भ्रष्ट केली, अमृता फडणवीसांना शिवसेना नगरसेवकाचा टोला
सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली, असं म्हणत शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘फक्त आडनाव ठाकरे असून चालत नाही’ अशी बोचरी टीका अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ‘इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो!’ असं ट्वीट घोले यांनी केलं आहे. त्यापुढे #ठाकरेठाकरेच! #आजच्याआनंदीबाई असे दोन हॅशटॅग द्यायलाही अमेय घोले विसरलेले नाहीत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावरुन ट्विटरवर टीका केली होती. ‘राहुल गांधी यांचे वक्तव्य निंदनीय आहे. वीर सावरकर आणि त्यांची महानता किंवा सत्कार्यांच्या जवळपासही राहुल गांधी पोहचत नाहीत. इतकंच नव्हे, तर त्यांनी स्वत:ला “गांधी” समजण्याची चूकही करु नये! कोणीही गांधी आडनाव लावून ‘गांधी’होऊ शकत नाही!’ असे ट्वीट करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती.
देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट कोट करुन अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. “खरं आहे देवेंद्र फडणवीसजी. त्याचप्रमाणे ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते,” असं ट्वीट करत अमृता फडणवीसांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टॅगही केले होते.
इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो! #ठाकरेठाकरेच! #आजच्याआनंदीबाई https://t.co/5GWTWJaCe6
— Amey Ghole (@AmeyGhole) December 22, 2019