छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी तात्काळ राजीनामे द्यायला हवे – संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना मान्य आहे का ? अशी विचारणा करत महाराजांच्या वंशजांनी तात्काळ राजीनामे द्यायला हवेत असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी आजही अशाच पद्धतीने टीका केली होती. यानंतर राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालण्यास सांगितले होते. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत नेमकी भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्रातील नेत्यांनी भूमिका घेतली पाहिजे असे आमचे म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. नरेंद्र मोदींशी महाराजांची तुलना करणं राज्यातील भाजपा नेत्यांना मान्य आहे का ? मान्य असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं,” असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आपल्या आधीच्या वक्तव्यासंबंधी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, ‘महाराजांचे जे वंशज आहेत ते सगळे भाजपात आहेत. मग कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही गाद्यांचे जे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांची जी तुलना केली आहे ती योग्य आहे की नाही याबद्दल भूमिका घ्या म्हटलं तर चिडण्याचं कारण नाही.
महाराजांचे वंशज आहात त्याबद्दल आम्हाला आदर आहे. याचा अर्थ तुम्ही भूमिका घेऊ नये असे आहे का? महाराजांची अशा पद्धतीने तुलना केल्याबद्दल तुम्ही तात्काळ राजीनामे द्यायला हवे,” असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी यावेळी माडले आहे.