येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. “महाडीबीटी पोर्टल” च्या माध्यमातून ही प्रक्रिया आता ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी प्रत्येकवेळी स्वतंत्र अर्ज द्यावा लागणार नाही. अर्जावरील कार्यवाहीचे एसएमएस देखील लाभार्थ्याला पाठविले जातील. यामुळे शेतकऱ्याला कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. सर्वच टप्प्यांवर मानवी हस्तक्षेप कमी होणार असल्याने योजनांमध्ये पारदर्शकता येईल, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.
“महाभूलेख” संकेतस्थळाची जोडणी करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ते पूर्ण होताच शेतकऱ्यांना अर्जासोबत “सातबारा” आणि 8अ ही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. या योजनेचे मोबाईल ॲप देखील विकसित करावे, अशी सूचना कृषीमंत्री भुसे यांनी विभागाला केली आहे. कृषीमंत्र्यांनी विदर्भाच्या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत अकोला, अमरावती, नागपूर येथे आढावा बैठका घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपेक्षित शेतकरी कल्याणाकरिता योजनांची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
कृषी हा राज्यातला पहिला विभाग आहे जो महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देणार आहे. त्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना त्याद्वारे लाभ घेता आला पाहिजे, अशा सूचना कृषीमंत्र्यांनी दिल्या आहेत.