परिवहन मंत्री अनिल परब यांनी एका आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची घोषणा केलेली आहे. एसटी महामंडळाची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, प्रवाशांना कार्यक्षम, तत्पर प्रवास सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत उत्पन्न वाढवा विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत एका महिन्यात म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या आगारांना दरमहा रुपये २ लाख इतके रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
तसेच जे आगार निकृष्ट कामगिरी करतील ,त्या आगारातील जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षेचे प्रयोजन देखील ठेवण्यात आले आहे. हे अभियान १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे. या अभियानामुळे एसटी प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन उत्पनात देखील वाढ झालेली दिसून येणार आहे. अशी माहिती एसटी व्यवस्थपक अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. एसटीचे प्रवासी उत्पन्न वाढावे यासाठी विविध स्तरावर उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री ॲड. अनिल परब यांनी आपल्या पहिल्याच बैठकीमध्ये दिले होते.
एसटीच्या २५० आगारांची प्रदेशनिहाय विभागणी करून प्रत्येक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करून उत्पन्नामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या प्रथम क्रमांकाच्या आगारात दरमहा रुपये २ लाख ,द्वितीय आगारास रुपये १.५ लाख व तृतीय आगारास रुपये १ लाख असे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याबरोबरच महामंडळाच्या ३१ विभागापैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना देखील आगाराप्रमाणे प्रथम क्रमांक रू २लाख , द्वितीय क्रमांकास रू १.५ लाख व तृतीय क्रमांकास रू १ लाख २५ हजार असे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.