राज्यात शिवसेना पक्षाने आपल्या जुन्या मित्र पक्षाला डावलून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर हातमिळवणी करून महाविकास आघाडी स्थापन केली. या घडलेल्या राजकीय घडामोडीला फक्त आणि फक्त फडणवीस आणि त्यांचा हट्टच कारणीभूत आहे, असे आरोप खुद्द भाजपा नेतेच फडणवीसांवर लावत आहे. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काम उद्धव ठाकरेंचे नाही म्हणून टीका करताना दिसत आहे. परंतु ज्या पाटलांना खुद्द त्यांच्या कोल्हापुरात कोणी ओळखत नाही त्यांनी इतरांवर आरोप करूच नये.
मागच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीला चंद्रकांत पाटील यांनी आपल्या घरच्या कोल्हापूर मतदार संघातून उभे न राहता पुणे येथील कोथरूड मतदार संघाची निवड केली होती. तसेच युतीमध्ये त्यांच्या कोल्हापुरातील दोन्ही भाजपा उमेदवारांचा पराभव झाला होता. हा पराभव त्यांनीच घडवून आणला होता, असा आरोप तेथील नेत्यांनी लावला होता. कोथरूड येथील त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी विरोध दर्शवला होता आणि आज तेच इतरांवर टीका करताना दिसत आहे.
मागच्या पाच वर्षात कोल्हापूरचे पालकमंत्री असताना पाटील यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा हातभार लावला नव्हता. आज महाविकास आघाडी घेत असलेल्या अनेक निर्णयामुळे हे सरकार पुढचे १५ वर्ष टिकेल अशीच भीती विरोधकांना म्हणजेच भाजपाला वाटत आहे, म्हणूनच काहीही टीका करण्यात भाजपा नेते व्यस्त दिसत आहे. तरीही याबाबत पाटील यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आणि नंतरच इतरांवर टीका करावी. आज कोल्हापुरात मंत्री सतेज पाटील आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफांनी दादांना “सळो की पळो” करून सोडले आहे.