राज्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांच्या रक्तात गद्दारी असल्याचे सांगत गणेश नाईक हे फडणवीसांशी प्रामाणिक राहतील का? असा प्रश्नच आव्हाडांनी उपस्थितीत केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी लागोपाठ दोन ते तीन ट्विट करत गणेश नाईकांवर निशाणा साधला. मंत्री आव्हाडांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, १९९० मध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने गणेश नाईक यांना मान आणि प्रतिष्ठा मिळाली. १९९९ मध्ये नाईकांनी त्यांच्यासोबत गद्दारी केली. त्यानंतर २०१४ पर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना सांभाळून घेतले. त्यांच्या प्रगतीच्या वाटा खुल्या केल्या. नाईकांना २०१४ पासूनच पक्ष सोडायचा होता. पण २०१९ मध्ये तो योग जुळून आला.
2014 लाच त्यांच्या मनात गद्दारीचा विचार आला आणि 2019 ला तो जुळून आला.
शहा आणि मोदी हे गुंड आहेत आणि लुटारू आहेत ते देशातून पळून जातील असं म्हणणारे गणेश नाईक हे देवेंद्र फडणवीस यांच्याशी इमानदार राहतील.
गद्दारी रक्तात आहे #गद्दार_गणेशनाईक— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 8, 2020
तसेच त्यांनी आणखी दुसऱ्या ट्विटमध्ये लिहले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गुंड आणि लुटारु आहेत. ते देशातून पळून जातील, असे म्हणणारे गणेश नाईक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रामाणिक राहतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला आहे. गद्दारी त्यांच्या रक्तात आहे, असा उल्लेखही आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. यापूर्वी गणेश नाईक हे खंडणीबहाद्दर आहेत, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी नाईकांवर टीका केली होती. आव्हाड यांच्या या टीकेला नाईक यांनी प्रत्युत्तरही दिले होते. मी खंडणी बहाद्दर असल्याचे पुरावे द्या आणि गुन्हा दाखल करा, असा पलटवार गणेश नाईकांनी आव्हाडांवर केला होता.