कोल्हापुरात “आमचं ठरलंय” पक्षाची स्थापना
कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीला काँग्रेस नेते तथा राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ ची हाक देत मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी उमेदवार धनंजय महाडिक यांना साथ न देता शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून आणले होते. त्यावेळी “आमचं ठरलंय” हे वाक्य कोल्हापुरात नाही तर संपूर्ण राज्यभर गाजले होते.
मात्र आता याच नावाने चक्क कोल्हापुरात पक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यात आली असून, मान्यतेची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आता ‘आमच ठरलंय विकास आघाडी’ या नावाने पक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गृहराज्यमंत्री पाटील यांचे समर्थक प्रमोद पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे या पक्षाच्या नोंदणीसाठी कागदपत्रे सादर केली आहे. त्यानुसार आयोगाने हरकती मागवल्या आहेत. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला अधिकृत मान्यता मिळेल, असे सांगण्यात आले आहे.
कोल्हापुरात अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर होत नाहीत. अशा वेळी या आघाडीच्या वतीने हा गट निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हे ताराराणी आघाडीचा या पद्धतीने अनेक वर्षे वापर करतात. तीच चाल गृहराज्यमंत्री पाटील यापुढे खेळण्याची चिन्हे आहेत. आगामी गोकुळ दूध संघ व राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्याची झलक दिसण्याची शक्यता आहे.