फडणवीसांना आरोप करण्याचा अधिकार नाही! – बाळासाहेब थोरात
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी ओल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी केलेल्या टीकेला महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
जेव्हा कोल्हापूर, सांगलीला पूराची स्थिती होती, लोक बुडत होते तेव्हा फडणवीसांचा गाजावाजा करत विदर्भाचा दौरा सुरू होता. यावर राजकारण कोणी करू नये. मदत कशी करता येईल ते एकत्रित पाहू. राज्यातील सरकार मदत करेलच, मात्र भाजपचं केंद्रात सरकार आहे त्यांनी दिल्लीत जाऊन मोदींना भेटून मदत मागितली तरी जास्त चांगला दिलासा लोकांना आपण देऊ शकू, असे थोरात यांनी पत्रकार माध्यमांसमोर बोलून दाखविले.
पुढे बोलताना थोरात म्हणाले की, सांगली, कोल्हापूर पूरपरिस्थितीत भाजपचं कुणी फिरकलं नाही. तेव्हा त्यांनी जी मदत जाहीर केली ती आम्ही सत्तेत आल्यावर दिली, त्यांनी मदत दिली नाही. आम्ही तेव्हा ज्या मागण्या केल्या त्या त्यांनी कुठे पूर्ण केल्या? शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत, आघाडीचे नेते आहेत. आम्ही सर्व एकत्र काम करतोय. सर्व नुकसानीचे लवकरात लवकर पंचमाने संपतील आणि पुन्हा तिथलं जीवन उभं राहील असा दिलासा आम्ही देऊ, असे थोरात यांनी बोलून दाखविले.