‘फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही चितपट करू!’ – जयंत पाटील
बृहन्मुंबई महानगर पालिकेवर यावेळी भगवाच फडकेल पण तो भारतीय जनता पक्षाचा असेल, असे वक्तव्य करत आघाडी सरकारला डिवचण्याचे काम विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. आता त्यांच्या या आवाहनाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आव्हान दिले आहे.
‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता उठाबशा काढत असले, तरी त्यांना माहिती झालं आहे की मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यांना आम्ही चितपट करणार आहोत’, असा विश्वास यावेळी मंत्री पाटील यांनी बोलून दाखविले होता. आज ते पुण्यात महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. पाटील यांच्या या वक्त्यव्यामुळे येणारी मनपा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहे याचे संकेत मिळत आहे.
पुण्यात महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत उद्यापासून पुण्यातील ११ तालुक्यातून संयुक्त प्रचार सुरु करणार असल्याचं सांगितलं. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मंत्री विश्वजित कदम, खासदार अमोल कोल्हे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे उपस्थित होते. मविआकडून राष्ट्रवादीच्या तिकीटावर अरुण लाड रिंगणात आहेत.