राज्यात स्थापन झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यावर आता भाजपा नेते नारायण राणे यांनी टीका केली आहे. राज्यातील ठाकरे सरकारला वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. हे ठाकरे सरकार कामात शून्य आहे, असं सांगतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला. हा त्यांचा पायगुण आहे, असा टोला राणे यांनी लगावला होता. त्यांच्या या टीकेला परिवहन मंत्री अनिल परब यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
‘राज्य सरकारला राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही. सरकारने वर्षभर काम केलंय, म्हणून विरोधक निराश आहेत’, असं म्हणत त्यांनी राणेंना टोला लगावला आहे. ‘ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना सुरुवातीलाच कर्जमाफी दिली. कोरोनात जगाची दैना झाली आहे. ठाकरे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. विरोधकांना विरोध करण्याशिवाय पाच वर्ष काम नाही’, असं प्रत्युत्तर देखील अनिल परब यांनी सरकार पडणार असं भाकीत वर्तवणाऱ्या भाजप नेत्यांना दिलं आहे.