निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालं मोठं यश
राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालानं सिद्ध होतं असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं आहे. जनमताचा हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला. “देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीतर्फे त्यांचा पराभव होईल,” असं म्हणत जयंत पाटलांनी निशाणा साधला.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र आल्यावर काय होते, हेही या निकालाने दाखवून दिले आहे. राज्यात ऑपरेशन लोटसच्या वल्गना करण्यात येत होत्या. अनेकदा तीन चाकी सरकार असं म्हटलं जात होतं. परंतु महाविकास आघाडीची ताकद भाजपाला लक्षात आली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव होण्याइतकी ही भक्कम आघाडी असल्याचे पाटील म्हणाले.
फडणवीसांचा शिवसेनेला टोला
“नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा किमान एकतरी उमेदवार विजयी झाला. पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीही लागलं नाही. त्यांचा एकही उमेदवार जिंकलेला नाही. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरं. परंतु या तीन पक्षातील केवळ दोघांनाच या निवडणुकीचा फायदा झाला आणि एका पक्षाला मात्र एकही जागा मिळालेली नाही. ज्यांचा राज्यात मुख्यमंत्री आहे, त्यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी आता याचं आत्मचिंतन करावं”, असा टोला फडणवीस यांनी लगावला.