भाजपा नेते ग्रामपंचायतीच्या प्रचाराला, अजित पवार म्हणतात की,,,!
राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यात येत्या १५ जानेवारी रोजी ग्रामपंचातीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यात ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपचे बडे नेते प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे. आता या नेत्यांचा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य कुठल्या पक्षाचे आहेत हे कधी कळत नाही. कारण तिथं कुठल्याच पक्षाचे चिन्ह नसते. जे निवडून येतात ते सांगतात. आम्ही तुमच्याच पक्षाचे आणि काम करून घेतात. असे सांगतानाच मी ३० वर्ष ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहत आलो आहे. आमच्या इथेही दोन गट उभे राहतात. जे निवडून येतात ते आम्हाला येऊन भेटतात आणि म्हणतात आम्ही साहेबांचेच असं म्हणत अजित पवार यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.
भाजपचे बारा नेते मैदानात उतरणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यामुळे काही तरी काम करतोय, हे दाखवायचं आहे. त्यांच्या पक्षाने काय करावे, हा सर्वस्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा प्रश्न आहे. मी त्यावर भाष्य करणार नाही. पण ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही पक्ष महत्त्वाचा नसतो असे पवारांनी म्हणून दाखविले.