भारताला टी-२० विश्वचषक जिंकवून द्यायचा आहे – रोहित शर्मा

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका जगभरातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द केल्या आहेत. लॉकडाउन काळात भारतीय खेळाडू आपल्या घरात राहून परिवारासोहत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं आयोजनही यंदा करोनामुळे धोक्यात आहे. मुंबई इंडियन्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत रोहित शर्माने आपल्याला भारताला टी-२० विश्वचषक जिंकवून द्यायचा आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.

“टी-२० विश्वचषक जिंकण आमच्या सर्वांसाठी एका स्वप्नासारखं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही स्पर्धेसाठी जाता तेव्हा प्रत्येक सामना तुम्हाला जिंकायचा असतो. विश्वचषकाची गोष्ट वेगळी असते. मला भारतासाठी विश्वचषक जिंकायचा आहे. यंदाचा टी-२० विश्वचषक खेळवला जाईल की नाही मला माहिती नाही. पण खेळवला गेल्यास त्यासाठी सराव करायला वेळ मिळेल का हा देखील एक प्रश्नच आहे.” रोहितने आपलं मत मांडल.

२०२० वर्षात भारतीय संघाच्या पहिल्या परदेश दौऱ्यात रोहित शर्मा सहभागी झाला होता. न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. रोहित शर्मानेही या मालिकेत आपली छाप पाडली. मात्र अखेरच्या टी-२० सामन्यात रोहित दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला संघातलं स्थान गमवावं लागलं. सध्या करोनामुळे सर्व क्रीडा स्पर्धा बंद असल्यामुळे भारतीय खेळाडू मैदानात कधी परत येत आहेत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here