पक्ष कार्यालयात पुस्तक प्रकाशित झाले, संबंध कसा नाही – संजय राऊत
“आजके शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकावरून संपूर्ण राज्यात भजपा विरोधात संतापाची लाट पसरलेली आहे. त्यातच खासदार संजय राऊत यांनी साताऱ्याचे राजे व माजी खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे राजे तथा खासदार छत्रपती संभाजी राजे यांना प्रश्न विचारत भारतीय जनता पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी केलेली आहे. अखेर या पुस्तकावर पडदा टाकण्याचे काम सध्या भाजपा नेत्याकडून चालू झालेले आहे. या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर भाजपाकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ठीकरण देत सदर प्रकारांतून हात झटकले आहे. “या पुस्तकाशी भाजपाचा काही संबंध नाही”. असे त्यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.
नाही तर भाजपाचे एकही कार्यालय ठेवणार नाही, संभाजी ब्रिगेडची धमकी
त्यावर पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्याशी संबंध नसल्याचे भाजपा नेत्यांनी म्हटलं होते. यावर शिवसेनेने प्रश्न उपस्थित केला आहे. “महाराष्ट्र सदनावर ज्यांनी हल्ला केला त्या जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले. सदनावरील हल्ल्यात तेव्हा शिवरायांच्या प्रतिमेसही तडे गेले होते. आता भाजपावाले म्हणतात, गोयलशी आमचा काय संबंध? संबंध नाही कसा? पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले व भाजपचे नेते त्या वेळी हजर होते. हे गोयल आजही म्हणतात, ”आमचे शिवाजी फक्त नरेंद्र मोदीच!” आता यावर महाराष्ट्रातील भाजपा पुढाऱ्यांनीच बोलायचे आहे. ११ कोटी जनता बोलते आहेच. छत्रपती शिवरायांचे वारसदारही आता चिडले आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला आहे. शिवरायांच्या वंशजांनी म्यानातून सपकन तलवार काढावी. ती आता काढली आहे व त्याबद्दल त्यांचे आभार! भाजपची तोंडे ‘म्यान’ झाली म्हणून आम्ही हे शिवव्याख्यान मांडले,” अशा शब्दात शिवसेना पक्षाने भाजपाला सुनावले आहे.