राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून राज्यभरातील वाड्या वस्त्यांतून जात हद्दपार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. आजही गावागावांमध्ये महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवाडा, चांभारवाडी असा उल्लेख केला जातो. अशा प्रकारे जातीनिहाय वाड्यांचा उल्लेख केला जाऊ नये व त्याऐवजी समतानगर, भीमनगर, क्रांतिनगर असे नामकरण करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. गावांचा, तेथील नागरिकांचा विकास झाला तरी त्यांच्या जातीवरुन वाड्य़ा-वस्त्यांचा केला जाणारा उल्लेख अनुचित असल्याचे मानून या वाड्यावस्त्यांचे नामकरण करण्याविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना सूचना केली होती,
अशी माहिती ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तातून समोर आली आहे. राज्य सरकारडून दलितमित्र पुरस्कार दिला जात होता. त्यातही बदल करीत पुरस्काराच्या नामातील ‘दलित’ हा उल्लेख 2 एप्रिल 2012 रोजी काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्याऐवजी समाजभूषण अशा नावाने पुरस्कार दिले जात आहे. सध्या नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग व महसूल विभागाने त्यासाठी अनुकूलता दर्शविली असून मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या क्षेत्रांनुसार कार्यवाही होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.