राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर….!
“निसर्ग” चक्रीवादळानंतर कोकणच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काजू, फोफळी, आंबा आणि नारळाच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्यापासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.
उद्या पवार हे रायगड जिल्हयाला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची आणि प्रशासनाकडून सुरु असलेल्या कामांची माहिती जाणून घेतील. त्यानंतर १० जून रोजी ते रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देणार आहे. या भेटीदरम्यान, त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही मंत्रीसुद्धा असतील.
दरम्यान, हा दौरा आटोपताच ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कशाप्रकारे मदत करता येईल यावर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईला परत येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या लोकांना पुन्हा उभं कसं करायचं? रायगड, रत्नागिरी, पुणे आणि इतर जिल्ह्यातील शेतीचं झालेलं नुकसान कसं भरून काढायचं. तसेच कोकणातील फळबागांना विशेष मदत देऊन या फळबागा पुन्हा उभ्या करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे शरद पवारांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.