आघाडीला ‘सर्कस’ म्हणणाऱ्या राजनाथसिंह यांना राष्ट्रवादीने हाणला टोला…!
राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकत्रीत महाविकास आघाडी सरकारला ‘सर्कस’ म्हणणारे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ‘रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही सरकारला सर्कस म्हणतात’, अशी बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच कोविड १९ साथीच्या विरोधात राज्य सरकारने दिलेल्या लढ्याचं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेही (ICMR) कौतुक केले आहे, याची आठवणही नवाब मलिक यांनी करून दिली आहे.
महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी सोमवारी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. ‘महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरू आहे. या सरकारकडं कसलीही दूरदृष्टी नाही’, असं ते म्हणाले होते. स्थलांतरीत मजुरांना मदत करणाऱ्या सोनू सूदचं कौतुक करताना राजनाथ सिंह यांनी शिवसेनेचाही समाचार घेतला होता.