माझ्या सैनिकांमुळेच शिवसेना सत्तेत होती, आहे आणि राहणार – उद्धव ठाकरे
हे सगळे तुम्ही माझे साथी सोबती आहात, हे असे सैनिक मिळायला सुद्धा भाग्य लागते. केवळ मी माँ आणि बाळासाहेबांचा पुत्र आहे म्हणून हे भाग्य मला लाभलं आहे.” तुमच्यासारखे शिवसैनिक असल्यामुळेच “मी सत्तेत होतो, सत्तेत आहे आणि उद्याही शिवसेना सत्तेत राहणार” असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. दसऱ्याच्या शुभमहोत्सवर आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी तमाम शिवसैनिकांना संबोधित करतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, अत्यंत प्रामाणिकपणाने युतीचे काम करायचे आणि विधानसभेवर आपल्या युतीचा भगवा फडकवायचा, हा भगवा आपल्या शिवरायांचा भगवा आहे. मला युवकांना सांगायचे आहे की तुम्ही आता पुढे या, आज पर्यंत इतिहास हा युवकांनीच घडवला आहे आणि हा इतिहास पुन्हा घडवायचा आहे. मी तमाम महाराष्ट्रातल्या सैनिकांना जिथे जिथे त्यांच्या जागा सुटल्या असतील त्यांची मी माफी मागतो, पण एक लक्षात घ्या तुमची ताकद कधीही कुठेही कमी होता कामा नये. असे म्हणत त्यांनी उमेदवारी न मिळालेल्या शिवसैनिकांची जाहीर माफीही मागितली.
पुढे युती बद्दल भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाला पाठिंबा नाही द्यायचा नाही तर मग कुणाला पाठिंबा द्यायचा? कलम ३७० काढू नका म्हणणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा का? शरद पवार आणि इतर मंडळींचे टार्गेट जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपले टार्गेट तेच लोक राहणार. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा कोथळा काढू हे विसरु नका असेही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले. भाजपा आणि शिवसेनेची युती महाराष्ट्राने स्वीकारली आहे. जागावाटपावर जे टीका करत आहेत त्यांना माझं हे उत्तर आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.