सेलू (परभणी): नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जिंतूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव यांना २३ हजार ९५७ मतांची आघाडी मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीचे आ़ विजय भांबळे यांच्यासाठी अग्नीपरीक्षा ठरणार आहे़लोकसभेच्या बहुतांश निवडणुकींमध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघाने शिवसेनेलाच आघाडी दिली आहे़ २०१४ मध्ये पहिल्यांदाच या मतदारसंघातून आ़ विजय भांबळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला़ त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून १५ पैकी १३ जिल्हा परिषदेचे सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले़ तसेच जिंतूर व सेलू या दोन्ही पंचायत समित्या आणि जिंतूर नगरपालिकेवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळविले़ स्थानिक पातळीवरही राष्ट्रवादी काँग्रेसने मजबूत जाळे विनले असल्याने लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांना या मतदारसंघातून आघाडी मिळेल, अशी परभणीपासून बारामतीपर्यंत चर्चा होती़
त्यामुळेच परभणी लोकसभेची जागा यावेळी खात्रीने राष्ट्रवादीच्या पारड्यात पडेल, असा अंदाजही बारामतीकरांसह एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांनी व्यक्त केला होता; परंतु, या संदर्भात सर्वांनीच व्यक्त केलेल्या अपेक्षा निकालांती फोल ठरल्या आहेत़ कागदावर तगड्या दिसणाºया राष्ट्रवादी काँग्रेसला येथे लोकसभेला लिड न मिळता शिवसेनेवर मतदारांनी अधिक विश्वास दाखविला़ त्यामुळे आ़ विजय भांबळे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या ताब्यातील सर्वच गटात राष्ट्रवादीची पिछेहाट झाली असून, स्वपक्षाचेच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आ़ भांबळे यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे़ जिल्हा परिषद सदस्य असो की नगरपालिकेचे सदस्य असो; प्रत्येकाच्या कामामध्ये आ़ भांबळे यांचा हस्तक्षेप असतोच असाच आरोप या पक्षाचे सदस्य खाजगीत करीत आहेत़ त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत त्यांनी मनापासून काम केले नसल्याची चर्चा आहे़