मराठी क्रांती मोर्च्यावेळी कार्यकर्त्यावर नोंद झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. आणि लवकरात लवकर हे गुन्हे मागे घेण्याची प्रकिया जलदगतीने राबवली जाणार आहे. अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. या प्रक्रियेसाठी मराठा कमिटी समन्वयकाची भेट सुद्धा घेतली आहे. या बैठकीला गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, मराठा समाज शिष्टमंडळातील प्रतिनिधी सर्वश्री राजेंद्र निकम, दिलीप पाटील, बाबा गुंजाळ, रुपेश मांजरेकर, संजय पाटील, विवेक सावंत, श्रीमती स्नेहा गावकर आदी उपस्थित होते.
मराठा मोर्चेकऱ्यावंर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी होत होती. पोलीसांवरील हल्ले आणि तत्सम गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान दिली होती. त्याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर तसेच डॉ. रणजित पाटील या उपसमितीचे सदस्य आहेत.
यावर गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली माहिती अशी की, मोर्चेकऱ्यांवरील मागे घ्यावयाच्या गुन्ह्यांबाबत पोलीस महांचालकांकडून प्राप्त झालेला अहवाल विधी व न्याय विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. येत्या आठ-दहा दिवसांत पहिल्या टप्प्यातील अभिप्राय मिळाल्यानंतर उपसमितीची बैठक घेतली जाईल. त्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. अशाच प्रकारे टप्प्याटप्प्याने अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले