मुख्यमंत्री निधीतून ५४ कोटी ७५ लाख परप्रांतीय प्रवासी शुल्कासाठी खर्च
राज्यात महाराष्ट्रातील व इतर राज्यातील स्थलांतरीत कामगार, मजुर अडकले आहेत. त्यांना ने आण करण्यासाठी असलेल्या श्रमिक रेल्वे तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार या ३६ जिल्ह्यांना ५४ कोटी ७५ लाख ४७ हजार रुपयांचा निधी देण्यात आला असून, तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाले आणि महाराष्ट्रात इतर राज्यातील कामगार आणि मजुर अडकले. तसेच महाराष्ट्रातील कामगार आणि स्थलांतरीत मजुरही इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा सध्या बाळगली जात आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील रकमांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या निधीचा वापर केवळ याच कारणासाठी वितरित करण्यात आला आहे.