पहिल्यांदा मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत पंढरपूरला पोहचले !
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरला पोहचले होते. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मात्र मुंबई ते पंढरपूर या प्रवासात त्यांनी बरोबर ड्राइवर न घेता स्वतः सात ते आठ तास गाडी चालवत दोन्ही बाजूचा प्रवास केला. आजवर अनके मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला भेटी दिल्या मात्र कधीही कोणी स्वतः गाडी चालवत आले नाही.
राज्यातील मुख्यमंत्र्याने स्वत: गाडी चालवत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. तोंडाला मास्क लावल्याशिवाय ते घराबाहेर पडत नाहीत. बैठका घ्यायच्या असतील तर त्या ऑनलाइन घेण्यावरही त्यांचा भर असतो. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून कुठेही जायचे असेल, तर ते स्वत: गाडी चालवत जात आहेत. त्यांच्या निवासस्थानाहून मंत्रालयात जायचे असेल तरीही ते स्वत: गाडी चालवत जातात.
महाराष्ट्रासह देशावरील आणि जगावरील करोनाचं संकट घालवण्याचं साकडं विठ्ठलाला घातलं. त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांशीही संवाद साधला. आपण सर्व माऊलींचे भक्त आहोत. इथे कोणी मुख्यमंत्री नाही आणि कोणी अधिकारी नाही. सर्वजण सारखेच आहेत. विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मला मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं. त्यातही अशा परिस्थितीत पूजा करावी लागेल, असंही कधी वाटलं नव्हतं, असंही ते म्हणाले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला.