टीका करणे हेच मनसेचं काम, अनिल परब यांनी लगावला मनसेला टोला
रात्रीचाच करोना असतो का ? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या मनसेच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, करोनाचा फैलाव होणारच नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही लिहून द्या, मग रात्री किंवा दिवसा काय करायचे, याचा विचार आम्हाला करता येईल, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरूवारी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोविड विषाणूच्या नव्या प्रजातीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आला आहे. मात्र, या संचारबंदीवरून मनसेनेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका करताना ‘रात्रीचाच करोना असतो का’ असा सवाल केला होता. त्यांच्या या प्रश्नाला परब यांनी उत्तर दिले आहे.
परब म्हणाले की, अशाप्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते. टीका करण्याशिवाय दुसरे कोणतेच काम त्यांच्याकडे राहिलेले नाही. टीका करणाऱ्यांना टीकाच करायची आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण राज्याची जबाबादारी सांभाळायची आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रत्येक पावले लोकांच्या काळजीसाठी आणि हितासाठी आहेत, असेही परब म्हणाले.