कृषी क्षेत्रा संबंधी शरद पवार यांनी लिहिलेल्या जुन्या पत्रावर संजय राऊत म्हणतात की…
सध्या देशभरात कृषी कायद्यावरून जोरदार आंदोलन सुरु झाले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना एक पत्र लिहिले होते. सध्या हे पत्र समोर आणून पवारांना अडचणीत आणण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत आहे. यावरुन सत्ताधाऱ्यांनी शरद पवारांना टार्गेट करताना त्यांच्या सध्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या पत्राबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे.
यावर बोलताना राऊत म्हणाले की, सन २०११ मध्ये शरद पवारांनी हे पत्र लिहिले त्यावेळची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची वेगळी आहे. स्वतः शरद पवार हे या देशातील कृषी क्षेत्रातील सर्वात मोठे तज्ज्ञ आणि अभ्यासक समजले जातात, त्यामुळे त्यांच्या पत्रासंदर्भात ते खुलासा करतील.
“आज ज्या अर्थी त्यांनी तेव्हा पत्र लिहिले आणि आज शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत आहेत. याचा अर्थ ते शेतकरी नेते असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांशी सहमत आहेत. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना कोणताही नेता त्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही, याच दृष्टीने शरद पवार यांच्या भूमिकेकडे पहायला हवं” असे राऊत यांनी बोलून दाखविले.