अजित पवार उपमुख्यमंत्री होताच, त्यांनी मंत्रालयात पाऊल टाकताच आणि बातमी येणे की सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणांची फाईल बंद, हा निर्णय जाणीवपूर्वक घेतलेला नाही, अशी शंका का घेता? हा योगायोग आहे, असा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंनी स्वपक्षाला घरचा आहेर दिलेला आहे. मागील काही दिवसापासून खडसे पक्षाच्या नेत्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.
ती फाईल बंद आधीच करायची होती. आता याला योगायोग म्हणायचा? की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणून ती फाईल बंद करण्यात आली, असे सांगायचे? की अजित पवार सरकारमध्ये आले म्हणून बंद केली, असे सांगायचे? ही जी शंका आहे जनसामान्यांमध्ये, त्यामुळे साहजिकच त्यांचा राजकारणावरचा विश्वास उडाला आहे अशी मार्मिक टीकाही एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर केलेली आहे.