सावरकर वादामुळे हिवाळी अधिवेशनाला गोंधळातच सुरूवात झाली. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडला. या ठरावाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर हा प्रस्ताव संमत झाला.
यावर बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरून अधिवेशन तापवले, या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित होतं, मात्र विरोधक महत्वाचे मुद्दे घेत नसल्याचा टोला लगावला.
स्वातंत्र्यवीर सावरकर या मुद्द्यावर गोंधळ करण्यापेक्षा अनेक दुसरे महत्वाचे मुद्दे आहेत,परंतु भाजपला मूळ विषयांना हातच लावायचा नसल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला. राज्यात शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक आहे परंतु सरकार या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे व लवकरच आणखी मदत देणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.