भाजपाला निद्रानाश झालाय – वाचा कोणी केली टीका.
भाजपाच्या वतीने आज संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र बचाओ आंदोलन आयोजित करण्यात आले होते. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात हे राज्य सरकार निष्क्रिय ठरलं असून, या सरकारला आता जाग आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेने आपल्या घराच्या अंगणात उभं राहुन सरकारच्या निष्क्रियते विरोधात काळे झेंडे, कोणत्याही काळ्या वस्त्राने निषेध व्यक्त करावा, असे भाजपकडून करण्यात आले आहे. मात्र ही वेळ राजकारणाची नसून समाजकार्याची आहे. मात्र भाजप कोरोनाच्या संकटात देखील राजकारण करत आहेत, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे.
तर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही भाजपच्या आंदोलनावर भाष्य करत टीका केली आहे. सत्ता गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते कमालीचे अस्वस्थ असून, अनेकांना निद्रानाश जडला आहे. राज्यावर कोरोना महामारीचे संकट असताना ते सत्ता हस्तगत करण्याचे दिवास्वप्न पहात आहेत, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. एका दैनिक वृत्त समूहाशी बोलताना भाजपच्या या आंदोलनाचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले की, सर्वपक्षीय समिती पेक्षा सर्व पक्षांना बोलवून कोरोनाबाबत सूचना जाणून घेणे योग्य वाटत. ज्या सूचना विरोधी पक्षाने केल्या त्या देखील आज सरकारने प्रत्यक्षात आणल्या. त्यांची अंमलबजावणी देखील केली. सध्या आपल्याला वैद्यकीय मदत लागणार आहे. लॉकडाऊननंतर अनेक प्रश्न भेडसावणार आहेत. मात्र आता प्राथमिकता कोरोनाला आहे. यावर सूचना येणे अपेक्षित आहे. सध्या कोणीही फोन उचलून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सूचना देऊ शकतात. मात्र विरोधी पक्षाकडून असे होत नाही. असे व्हावे हीच आमची अपेक्षा आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहे.