हे सरकार खोटं बोलत नाही, मुख्यमंत्री उद्धट नाहीत ! – मेघा पाटकर
‘सध्याचे राज्यातले सरकार खोटी आश्वासनं देत नाही आणि मुख्यमंत्रीही अॅरोगंट नाहीत’, अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी ठाकरे सरकारचे कौतुक केले आहे. उस्मानाबादच्या दौऱ्यावर आलेल्या मेधा पाटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील कोरोना संसर्ग आणि त्याअनुशंगाने सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना याविषयी त्यांनी अत्यंत नेमक्या शब्दांत आपली मते मांडली. कोरोनासारख्या महासंकटात राज्य सरकार व प्रशासन अत्यंत योग्यप्रकारे स्थिती हाताळत असल्याचे त्या म्हणाल्या.
कोरोना संसर्गाशी सध्या प्रशासन झुंजत आहे. या स्थितीत सरकारने कायद्यानुसार आपली जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा आहे. त्याचवेळी सरकारने केलेले आवाहन जनतेनेही ऐकावे, असे पाटकर यांनी नमूद केले.
‘हे संवादी सरकार असून कोरोना सारख्या संकटात आक्रस्ताळेपणा न दाखवता संयमाने परिस्थिती हाताळली जात आहे’, असे नमूद करत पाटकर यांनी सरकारचे कौतुक केले. सध्याचे राज्यातले सरकार खोटी आश्वासने देत नाही किंवा मुख्यमंत्रीही ‘अॅरोगंट’ नाहीत. अनेक वर्षांनंतर राज्याला असे सरकार मिळाले आहे. मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधताना आश्वासक आणि ठाम वाटत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेलाही त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, असे सांगतानाच हे संवादशील सरकार असल्याने ते संवेदनशील असेल ही अपेक्षा असल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले.