अर्णब गोस्वामी आणि कंगना रानौत विरोधात वरळी पोलिसात तक्रार दाखल.
केंद्र सरकारने अर्णब आणि कंगनाला हाताशी धरून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा डाव आखला आहे, असा आरोप भीमशक्ती आणि शिवशक्ती विचारमंचाचे अध्यक्ष तथा शिवसेना नगरसेवक चेतन कांबळे यांनी केला आहे. तसेच वरळी विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कंगनावर ऍट्रोसिटीचा तसेच अर्णबवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवदेनाद्वारे नगरसेवक कांबळे यांनी केली आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करणारे कंगना रानौत आणि अर्णब गोस्वामी हे राष्ट्रीय स्वयंसेवी संघाचे हस्तक आहे. केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी तसेच केंद्राने सुरु केलेल्या खाजगीकरणावर पडदा टाकण्यासाठी भाजपाने आखलेला डाव आहे, असे आरोप लावण्यात आले आहेत.
भाजपा सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देश अडचणीत आलेला आहे. ह्याच मुद्द्यांवरून देशाचे लक्ष बाजूला करण्यासारही सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा वापर जनतेची दिशाभूल करण्यासाठी केंद्र सरकार करत आहे, असा थेट आरोपही करण्यात आला आहे.