Skip to content Skip to footer

क्वारंटाईनचा नवा कोल्हापुरी पॅटर्न करतायेत खासदार धैर्यशील माने

क्वारंटाईनचा नवा कोल्हापुरी पॅटर्न करतायेत खासदार धैर्यशील माने

मुंबई आणि पुण्यासारख्या रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरण करावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस हा ताण प्रशासनावर वाढताना दिसत आहे. यावर उपाय म्हणून खासदार धैर्यशिल माने हे गावाच्या सुरक्षिततेसाठी आणि गावाच्या सहकार्यातून नवा कोल्हापुरी पॅटर्न विकसित करत आहेत. निगेटिव्ह अहवालानंतर संबंधितांची त्यांच्या घरीच राहण्याची सोय करायची आणि घरातल्या सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी रहायचे. शाहुवाडी-पन्हाळा तालुक्यापासून याची सुरूवात होणार आहे.

       रेड झोनमध्ये असणाऱ्या जिल्ह्यातून बऱ्याचशा प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिक येत आहेत. त्यांचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुढील 14 दिवस संस्थात्मक अलगीकरण करावे लागते. यावर पर्याय शोधून खासदार धैर्यशिल माने यांनी नवा पॅटर्न करण्यास प्रारंभ केला आहे. ते म्हणाले, अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या घरामध्ये ते राहण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचे घर रिकामे करायचे आणि त्या घरात रहात असणाऱ्या त्यांच्या सदस्यांनी आपल्या भाऊबंधांकडे किंवा शेजाऱ्यांकडे रहायचे. पुढील 14 दिवस संपर्कात यायचे नाही. त्या घरावर फलक लावून त्यावर अलगीकरण कालावधी लिहायचा. त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय त्यांच्या घरच्या लोकांनीच करायची.

येणाऱ्या लोकांची सोय करण्यात प्रशासनाला मर्यादा येत आहेत. त्यामुळे गावच्या सुरक्षिततेसाठी गावाच्या मदतीने या नव्या पॅटर्नची सुरूवात शाहुवाडी-पन्हाळा येथून सुरूवात करत आहोत. घरच्या लोकांनी आपल्या, गावाच्या सुरक्षिततेसाठी घर रिकामे करून बाहेरून येणाऱ्या आपल्याच लोकांना द्यावे आणि काही दिवस दक्षता घ्यावी, असे आवाहन खासदार धैर्यशिल माने यांनी या नव्या पॅटर्नच्या निमित्ताने केले आहे.

Leave a comment

0.0/5