इतिहासात पहिल्यांदाच राज्य सरकारतर्फे एवढ्या जलदगतीने मदत निधीचे वितरण – आमदार योगेश कदम.
संपूर्ण कोकणात त्यात प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने प्रचंड तांडव करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. त्यात शेत, फळ बागा, मूलभूत सुविधा, घरं व इतर गोष्टींचे नुकसान अधिक आहे. या संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तसेच ही विदारक परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकारतर्फे मदत जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार मदतीचे वाटप देखील सुरु झाले आहे.
या आर्थिक मदतीचे दोन प्रकारांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. परंतु ही मदत पुरेशी नसल्याने ही मदत वाढीव स्वरूपात मिळावी, यासाठी मी मागणी केली होती, अशी माहिती कदम यांनी दिलेली आहे. त्यानुसार अल्पशः नुकसान झालेल्या नागरिकांना ६,००० रु. व पूर्ण नुकसान झालेल्यांना ९६,००० रुपयांची मदत (नियोजित मदत) देण्यात येणार होती, परंतु वाढीव मदतीसाठी केलेल्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्याने ही मदत अल्प नुकसानग्रस्तांसाठी १५,००० रु. व पूर्ण नुकसान झालेल्यांसाठी १,५०,००० रु. अशी करण्यात आली आहे.
तसेच जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी पूर्णतः नुकसान झालेल्यांना वाढीव १०,००० रु. देण्यात येत असून, ही वाढीव रक्कम अल्पशः नुकसान झालेल्यांना देखील मिळावी यासाठी मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण होऊन त्याबाबत लवकरच शासन निर्णय येणार आहे. या सर्व मदतीचे वाटप सुरु झाले असून, सुमारे ८ कोटी रुपयांचे वितरण नुकसानग्रस्त नागरिकांना करण्यात आले आहे, अशी आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.
नागरिकांना अधिकाधिक मदत देण्यासाठी, त्यांचे पुनर्वसन जलद गतीने होण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. विशेष बाब म्हणजे राज्याच्या इतिहासात एवढ्या जलद गतीने आर्थिक मदत मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तरी सर्व नागरिकांनी धीर धरावा, सरकार आपल्यासाठी कसोटीचे प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.