शहरांपासून गावांमधील जनतेचाही महाविकास आघाडीवर विश्वास आहे – आदित्य ठाकरे
राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या सर्व निकालात शिवसेना पक्षाने मुसंडी मारत विजय मिळवला आहे. यावर आता युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झाला, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच शहरांपासून गावांपर्यंत लोकांचा या सरकारवर विश्वास आहे. कोराना काळात सरकारने परिस्थिती कशी हाताळली आहे, हे लोकांनी बघितले आहे. पर्यावरणाचा समतोल राखत विकास करत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.