महाआघाडीत मनसेला सामावून घेण्यासाठी जेवढा सकारात्मकपणा राष्ट्र्वादीने दाखविला तेवढा नकारात्मक भूमिका काँग्रेस नेत्यांनी मनसे विरोधात घेतली होती. कारण परप्रांतीया बद्दल मत मांडणाऱ्या मनसेला पक्षात घेतले तर आपली परप्रातीय मते फुटतील अशाच भीतीने काँग्रेस मनसेला सामाऊन घेण्यासाठीच विरोध करत होता. परंतु आता चित्र पूर्ण उलट झालेले आहे. आता काँग्रेस पक्षच राज ठाकरे यांच्या सभेची मागणी करताना दिसत आहे. कॉंग्रेसच्या लक्षात आता मनसेची ताकत आली आहे अशी चिन्ह दिसू लागली आहेत.आता काँग्रेसवालेच सांगताहेत की राज ठाकरेंची सभा घ्या, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले की, मोदी सरकार जावं ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका आहे. ठाकरे यांनी काही लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहोत, असे सांगितले आहे. म्हणून आम्ही काही सूचना दिल्या आहेत. काँग्रेस राज ठाकरेंबाबत अनुकुल नव्हती, मात्र आता तेच सांगताहेत की राज ठाकरेंची सभा घ्या. राज ठाकरेंना सोबत घ्यायला हवं होतं, असंही पवार म्हणाले. राज्यात साधारण सहा ते नऊ जागांवर राज यांच्या सभा होतील अशी माहिती समोर येत आहे. यात बारामती, मावळ, नाशिक, नांदेड, सातारा, सोलापूर, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य मुंबई आदी लोकसभा मतदारसंघाची चर्चा आहे.
मात्र, चर्चेतील सर्व मतदारसंघ हे आघाडीच्या दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ आहेत. त्यामुळे आघाडीतील दिग्गजांसाठी मनसेची तोफ धडाडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान,अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु मनसेच्या या निर्णयामुळे कुठेतरी मराठी मतदार राज ठाकरे यांच्या या निर्णयावर दुखावला गेला आहे असे समजते. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर मनसेने आपली तोफ गाडली आज त्यांच्याच उमेदवारांचा प्रचार करताना राज ठाकरे दिसणार आहेत. परंतु राज ठाकरे यांच्या या निर्णयावर मनसेच्या गोटतच विरोधाचे वारे वाहू लागले आहे.