Skip to content Skip to footer

संपत्तीच्या वादातून वडिलांनी मुलाला गोळ्या झाडून केले ठार

अकोल्यात संपत्तीच्या वादातून वडिलांनीच मुलावर बंदुकीतून गोळी झाडली आणि त्याची हत्या केली. अकोल्यातील जठारपेठ चौकात असलेल्या इंद्रायणी गतीमंद शाळेजवळच्या ब्रह्मांडनायक अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. सोमवारी दुपारीच ही घटना घडली आहे. बाबा भारती असं वडिलांचं नाव असून त्यांनी मुलगा मनिष भारतीवर गोळी झाडून त्याला ठार केलं. बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांचा मुलगा राजेश भारती हादेखील काँग्रेसचा मोठा नेता आहे. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीसही उपस्थित झाले.

बाबा भारती आणि त्यांचा मुलगा मनिष भारती यांच्यामध्ये संपत्तीचा वाद बऱ्याचदा होत होता. या वादाने परिसीमार गाठली होती. मनिष हा त्याचे वडील बाबा भारती यांच्या घरी धारदार शस्त्र घेऊन आला होता. त्यावेळी वडिलांसोबत संपत्तीवरुन त्याचा पुन्हा एकदा वाद झाला. मुलाच्या हाती असलेले धारदार शस्त्र पाहून बाबा भारती यांनी त्यांच्याकडे असलेली बंदुक काढली. मुलगा अंगावर धावून येत असल्याचे दिसतात त्यांनी बंदुकीतून त्याच्या छातीमध्ये एक गोळी झाडली. मुलगा मनीष हा जागीच ठार झाला.

ही माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी सिव्हील लाइन, रामदास पेठ यासोबतच शहर उपअधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलिस दाखल झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी बाबा भारतीला  ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनेबाबत बाबा भारती यांनी पत्रकारांशी सवांद साधून घटनेची तोंडी माहिती दिली. विशेष म्हणजे, बाबा भारती हे काँग्रेसचे नेते आहेत. तर दोन दिवस आधी मनिष भारती याला तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं. मनिष भारती हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.

Leave a comment

0.0/5