Skip to content Skip to footer

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा उघड ! – प्रताप सरनाईक

मीरा भाईंदर पालिकेतील सत्ताधारी भाजपने महाराजांच्या पुतळ्याचा विषय फेटाळून लावल्याने त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. निवडणुकांमध्ये छत्रपतींच्या नावाने मते मागायची आणि जेव्हा महाराजांच्या पुतळ्याचा विषय येतो तेव्हा त्यावर असे गलिच्छ राजकारण करायचे. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. ज्यांनी स्थायी समिती सभेत पुतळ्याला विरोध केला अशा बेगडी भाजप स्थायी समिती सदस्यांना शिवसेना महिला आघाडीतर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

ज्या भाजपने पुतळ्याचा विषय फेटाळला आहे त्या भाजपने महाराष्ट्र आणि छत्रपती शिवरायांची जाहीर माफी मागावी. तसेच पुढल्या स्थायी समिती सभेत हा विषय पुन्हा घेऊन एकमताने तो मंजूर करावा. अन्यथा पुतळा उभारण्याच्या कामाचा विषय आम्ही राज्य सरकारकडे नेऊन हा विषय सरकारकडून मंजूर करून घेऊ. परंतु भाजपच्या स्थायी समिती सदस्यांना कोल्हापूर येथून राईच्या तेलाने पाजळून आणलेले जोडे मारून त्यांना त्यांची जागा दाखवू. शिवसेनेची महिला आघाडी हे जोडे मारो आंदोलन हाती घेईल असा खणखणीत इशारा सरनाईक यांनी दिला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालनाला सुद्धा अशाच पद्धतीने भाजपने आधी विरोध केला होता व मीरा भाईंदरच्या जनतेने त्यांना विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवली. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करीत आहेत , त्यामुळे शहराची जनता आगामी महापालिका निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही , असेही सरनाईक यांनी म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5