सध्या पुन्हा एकदा मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार आणि मुंबई मनपाची डोकेदुखी वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी पासून सर्व प्रवाशांसाठी सुरु करण्यात आलेली लोकल सेवा पुर्वव्रत सुरु राहणार की बंद करण्यात येणार असा प्रश्न आज मुंबईकरांना पडला आहे.
त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील विविध यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांकडून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत लोकल सेवा पुन्हा सुरु झाल्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ झालेली आहे असे अधिकाऱ्यांनी बैठकीत बोलून दाखवले.
यावर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी म्हटले की, पश्चिम रेल्वेकडून कोरोना रोखण्यासाठी सर्व नियमांचे कडक पालन केले जात आहे. आम्ही पुन्हा एकदा ट्रेन सॅनिटाईज करायला सुरुवात केली आहे. याशिवाय, प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून ३०० तिकीट खिडक्या सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच आम्ही राज्य सरकारच्या सर्व नियमाचे पालन करत आहे असे त्यांनी सांगितले.