Skip to content Skip to footer

प्रेरणादायी : कर्ज फेडण्यासाठी ८० वर्षाच्या आजीबाई विकतात पाणीपुरी

मुलाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी ८० वर्षीय माऊली पाणी पुरी, भेळ विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत पाहून अगदी तरुण ही लाजतील अशा प्रकारे ८० वर्षीय आजी काम करतात. चंद्रभागा शिंदे असे ८० वर्षीय आजींचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी चंद्रभागा यांचे पती माधव शिंदे यांचा अपघात झाला. त्यात त्यांना आपला पाय गमवावा लावला.

मुलगा राजेंद्र यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली उसने, कर्जाने पैसे देखील घेतले आणि वडिलांवर तीन ते चार शस्त्रक्रिया केल्या. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे राजेंद्र यांच्यावर लाखो रुपयांचे कर्ज झाले. त्याचे व्याज आणि मुद्दल आजही ते परत करत आहेत.

८० वर्षीय चंद्रभागा या गेल्या कित्येक वर्षांपासून पाणीपुरी, भेळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे पती माधव यांना व्यवसायत त्या हातभार लावत. त्यांचे पती हे एकेदिवशी आकुर्डीच्या दिशेने सायकलवरून येत असताना दुचाकीने ठोकर दिली. यात माधव यांना जबर मार लागला. त्यानंतर पाच-सहा महिने ते अंथरुणावर होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे माधव यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

काही दिवसांच्या अंतरांनी त्यांच्यावर तीन ते चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी लाखो रुपयांचा खर्चही झाला. त्यांच्या मुलालाही आपले वडील बरे होतील अशी आशा होती. मात्र, त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शिंदे कुटुंबावर लाखो रुपयांचे कर्ज झाले आणि आजही ते पैसे परत करत आहेत.

या सर्व घटनेमुळे ८० वर्षीय चंद्रभागा या स्वस्थ बसत नाहीत. गेल्या चार महिन्यापासून आजी आकुर्डीमध्ये भेळ आणि पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. पाणीपुरी आणि भेळसाठी खास त्या पाट्यावर चटणी बनवतात. त्यामुळे त्यांच्या भेळ, पाणीपुरीला वेगळीच चव येते. दरम्यान, आजी या ८० व्या वर्षी काम करत असल्याचे पाहून अनेक तरुणांनी त्यांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अगदी वाऱ्याच्या गतीने तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. यामुळे आजींच्या गाड्यावर लहानापासून मोठ्यांपर्यंत ग्राहकांची मोठी गर्दी दिसते आहे. त्यांच्यात काम करण्याची जिद्द आणि इच्छा शक्ती खूप मोठी आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मुलाला पैसे परत करण्यात त्यांची मदत होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.
आजी म्हणतात…आई काळजी करते म्हणून मुलगा राजेंद्र त्यांना किती कर्ज आहे ते सांगत नाही. मुलगा म्हणतोय काम करू नकोस, पण माझा जीव मुलात आहे. राहवत नाही असे आजींनी सांगितले. कर्जातून तो लवकर मुक्त व्हावा यासाठी काम करत आहे असे म्हणत असताना आजींना गहिवरून आले होते. बेरोजगार तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे. जेणेकरून त्यांना दोन वेळचे जेवण मिळेल असेही त्या बोलताना म्हणाल्या.
सलाम आहे त्यांच्या जिद्दीला. या वयात त्या काम करत आहेत. पाट्यावर वाटून केलेली चटणी पाणीपुरीसाठी वापरतात. तरुणांनी आजींकडून आदर्श घेतला पाहिजे. आजींची सोशल मीडियावर पोष्ट पाहिली त्यानंतर आम्ही आजींना शोधत या ठिकाणी आलो.

Leave a comment

0.0/5