Skip to content Skip to footer

रायगडमधील पर्यटनस्थळे गजबजली

नाताळ सुट्टी, नववर्षांच्या स्वागताची तयारी

नाताळची सुट्टी तसेच नववर्षांच्या स्वागतासाठी अलिबाग आणि रायगड जिल्ह्य़ातील विविध किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झाली व त्यातून वाहतूककोंडी झाली. तीन दिवसांत जिल्ह्य़ात सुमारे ३० हजारांपेक्षा अधिक पर्यटक आल्याचा अंदाज व्यक्त के ला जातो.

अलिबाग, मुरुड, दिवेआगर, किहीम, मांडवा, नागाव, आक्षी, रेवदंडा हरीहरेश्वर आणि श्रीवर्धन समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले माथेरानही पर्यटकांनी बहरून गेले आहे.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ठिकठिकाणी नववर्षांच्या स्वागताच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल व्यवसायिकांनी ऑर्केस्ट्रा, डिजे नाइट्स, गाला डान्स, सेलिब्रिटी नाइट्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कुटुंबीयांसाठी विशेष आकर्षक सवलती दिल्या जात आहेत.

पोलिसांकडून वाहतूक नियोजन

नववर्षांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्य़ात मोठय़ा संख्येने पर्यटक येण्याचा अंदाज वर्तविला जातो. नाताळ आणि त्यानंतर शनिवारी आणि रविवारी दिवस झालेली वाहतूककोंडी लक्षात घेऊन मुंबई-गोवा महामार्गावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक निंयत्रणासाठी १२० पोलीस कर्मचारी आणि ९ पोलीस अधिकारी असा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

समुद्रकिनाऱ्यांवर तात्पुरत्या पोलीस चौक्या

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्य़ातील प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर तात्पुरत्या पोलीस चौक्या उभारण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. बीट मार्शल्स, दामिनी पथक, साध्या गणवेशातील कर्मचाऱ्यांसह, सशस्त्र पोलीस बंदोबस्त किनाऱ्यांवर ठेवला जाणार आहे. १५० पोलीस कर्मचारी, ३० महिला कर्मचारी, तर ३० वाहतूक कर्मचारी किनारपट्टीवरील भागात तैनात केले जाणार आहेत. जिल्ह्य़ातील २१० किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर तीन स्पीड बोटींच्या साहाय्याने २४ तास गस्त घातली जाणार आहे. लाइफ जॅकेट्स, स्पीड बोटी आणि जीवरक्षक तैनात ठेवण्यात येणार आहेत. पर्यटकांना सूचना देण्यासाठी ध्वनिप्रक्षेपकही बसवण्यात येणार आहे.

तीस हजारांवर पर्यटक

नाताळचा सण आणि लागोपाठ आलेल्या सुट्टय़ांच्या पार्श्वभूमीवर २४ ते २७ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्य़ात जवळपास ३० ते ३५ हजार पर्यटक दाखल झाले होते. त्यामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढली होती. मुंबई-गोवा महामार्गासह, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, अलिबाग-मुरुड मार्ग,अलिबाग-पेण महामार्गावर वाहनांची कोंडी झाली होती. आठ ते दहा किलोमीटरचे अंतर पार पाडण्यासाठी दोन ते अडीच तास लागत होते. वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

नऊ ठिकाणी तपासणी नाके

मोठय़ा प्रमाणात दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन जिल्ह्य़ात ९ ठिकाणी करोनाविषयक तपासणी नाके सुरू केले जाणार आहेत. यात मांडवा, रेवस, खारपाडा, वडवली टोल नाका, माथेरान, वाकण फाटा, ताम्हाणी घाट, वरंध घाट, शिवाजी महाराज चौक पोलादपूर येथील तपासणी नाका यांचा समावेश असणार आहे. या ठिकाणी दाखल होणाऱ्या पर्यटकांची करोनाविषयक प्राथमिक तपासणी केली जाणार आहे.

निर्बंधाचे सावट

* नववर्षांच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्य़ात येणाऱ्या पर्यटकांवर निर्बंधांचे सावट असणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पर्यटकांची ९ ठिकाणी तपासणी केली जाणार आहे.* सार्वजनिक ठिकाणी रात्री संचारबंदी लागू असणार आहे. मात्र हॉटेल-रिसॉर्टमध्ये करोनाविषयक नियमांचे पालन करून नववर्ष स्वागत करण्यास मुभा देण्यात आली आहे.* जिल्ह्य़ात २५ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

* रात्री ११ ते सकाळी ६ या दरम्यान पर्यटकांना सार्वजनिक ठिकाणी संचार करता येणार नाही. नदीकिनारे, समुद्रकिनारे या ठिकाणी एकत्र येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.

नववर्षांचे स्वागत करताना जिल्ह्यात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. हे प्रतिबंध नागरिकांच्या हितासाठीच आहेत. त्यामुळे त्यांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे.

Leave a comment

0.0/5