पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी – उद्धव ठाकरे
पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हा केवळ सरकारी उपक्रम न राहता ती प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहिजे. माझी वसुंधरा अभियान राबविताना यामध्ये प्रत्येकाने सहभाग द्यावा आणि याला लोकचळवळीचे स्वरूप देण्यात यावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले आहे.
पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागामार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत माझी वसुंधरा ई-शपथ उपक्रम राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला.
नव्या वर्षांची सुरुवात कशी करावी याची एक नवीन वाट पर्यावरणाच्या रक्षणासाठी शपथ घेऊन या कार्यक्रमातून दिली गेली आहे. या अभियानातून फक्त देशालाच नव्हे तर जगालाही पर्यावरण संवर्धनाची एक नवीन दिशा मिळेल असे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मी कटिबद्ध राहीन, अशी शपथ घेतली.